इरशाळगड-शिवाजी शिडीने माथेरान

पुन्हा एकदा कर्जतचं बसस्थानक. इंद्रा आणि अतल्या पडल्या पडल्या झोपेच्या अधीन झालेले. मी आणि सागरला झोप येत नव्हती कि मच्छरांची लागवड जास्त प्रमाणात झाली होती,हे कळायला मार्ग नव्हता. कर्जतला पावसाळ्यात रात्रीचं कधी राहिलो नसल्यामुळे,या उपद्रवाची कल्पनाच नव्हती. येथे डासांनी भयानक तांडव माजवले असताना या दोघांना झोप कशी लागत होती ? आणि वरून हा सागर पेटला होता,हे मनोरेचं कार्ट मोबाईल वर चित्र-विचित्र गाणे लावून एकटाच नाचायला  लागलं होतं. काय कळेना ! हा सर्व कार्यक्रम चालू असताना जरा थोडा वेळ डोळा लागला तर बसस्थानकवरच्या गर्दीच्या किलबिलाटानी जाग आली. सकाळचे साडेचार -पाच झाले असावेत. बसस्थानक ट्रेकर/पिक्नीकर लोकांनी भरून गेलं. कुणी भीमाशंकर,कुणी पेबचा किल्ला,कुणी माथेरान,असंच काही बाही. आम्ही पनवेलला जाणाऱ्या पहिल्या बसची वाट पाहत थांबलो. 


नशा. व्यसन म्हणा हवं तर. नशा हा शब्द जरा त्यातला वाटतो. महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला लागलेलं सह्याद्री नावाचं व्यसन. आणि माणूस एकदा सह्याद्रीच्या वाटेला लागला की ही वाट सुटणे अशक्य. शिवाय हे व्यसन कधीही सुटू नये ही आम्हा जातिवंत भटक्यांची मनस्वी इच्छा. पोर सुखरूप घरी येऊ दे ही आमच्या आईवडिलांची देवाकडून माफक अपेक्षा! पण आईबाबा तुम्ही काळजी करू नका. तुमचं पोर कधीच आगाऊ धाडस करणार नाही. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि आशीर्वाद द्या. बास ! 

अशाच व्यसनान्ध आम्हा भटक्यांचे पाय आम्हाला घरात स्वस्थ बसू देईनात. तरी बरं या पावसात प्रत्येक आठवड्याअंती आमच्या चार मोहिम पार पडल्या होत्या. पण व्यसनच ते. आम्हाला घरातून बाहेर पडणं भागच होतं. रद्द होता होता सागर,अतुल, इंद्रा आणि मी अशी चांडाळ चौकडी तयार झाली. बेत पक्का झाला.  शिवाजी शिडीने माथेरान गाठायचं. 

कोंकण. कोंकण म्हणजे रायगडाची सोपी चढाई करताना चांगल्या ट्रेकरची धांदल उडवणारं दमट वातावरण. कोंकण म्हणजे हरिहरेश्वर सारख्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावरचा सांजवेळ गारवा. कोंकण म्हणजे रायगडावरील महादारवाज्याची प्रतीकृती असणारया सुधागडावरील दरवाज्याबद्दलची कुतूहलता. कोंकण म्हणजे महाराजांनी हेरलेले सागरी आरमाराचे महत्व. कोंकण म्हणजे महाराजांच्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या सिंधुदुर्गाचा प्रदेश. कोंकण म्हणजे सह्यापर्वताची मुख्य रांग कापत,घाटमाथ्यावरून उतरत घाटाने अथवा कुठल्याशा नाळेने गाठण्याचे अचाट वेड. 

याच कोंकणात सह्याद्रीच्या पोटात असलेल्या एका डोंगरावर कुणा एका गोऱ्या साहेबाने म्हणे खूप वर्षाआधी विकास करून ठेवलाय. तेच आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक…. माथेरान, म्हणजेच माथ्यावर रान असलेला डोंगर. पण माथा गाठायचा आडवाटेने. डोंगरातील पायवाटेने.

पावणे सहाला बस आली,अर्ध्या तासात चौकला पोहोचलो . एकाला इरशाळवाडीची वाट विचारून उदरभरणाचा कार्यक्रम आटोपला आणि इरशाळ वाडीकडे चालायला सुरुवात केली. रात्री मुसळधार पावसाने हजेरी दिल्यासारखं,सकाळचं वातावरण मन प्रसन्न करून गेलं. रेल्वे रूळ ओलांडून गाडी रस्त्याला लागलो. येथूनच मोरबे धरणाची भिंत उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला धुक्यात हरवलेला इरशाळगडाचा उतुंग आणि अवघड असा सुळका,यांचे दर्शन झाले. मघाच्या उदरमभरणं या कार्यक्रमाचा उत्तरार्ध अर्थातच नैसर्गिक कौल! इंद्राने पुढाकार घेतला. आणि नेहमीप्रमाणे अविस्मरणीय क्षण टिपण्यात सागर मश्गुल असल्यासारखं दुरून दिसलं. पण इंद्रा पत्ता लागु देतो व्हय? सागरनी यशस्वी माघार घेतली. तिकडी जेथून इरशाळ वाडीची पायवाट सुरु होते तिथे येउन थांबली. गाडीरस्ता संपणार होता. इंद्रा कौल देऊन परतला. गाडीरस्ता सोडून डाव्या बाजूने असलेल्या चिखलातून चालायला सुरुवात केली. आणि ज्याची दाट भीती होती तेच झालं. मनोरेचं कार्ट भूंकलं,"आपल्याला इरशाळ गड करायचाय, आता इरशाळ गड उतरूनच माथेरान गाठू ". हे प्लान मध्ये नव्हतं. आता एक म्हणजे हे कार्ट ऐकणारं नव्हतं आणि दुसरं आम्हाला पण इरशाळ गडाचा सुळका खुणावत होताच. होकार द्यायला पर्याय नव्हता. ठरलं आधी मोहीम इरशाळगडाची. 


इरशाळ वाडीच्या वाटेला लागलो तोच,आजूबाजूच्या पाड्यातून बायाबापडे डोकावत होती. सगळ्यांची सकाळची कामे चाललेली. उजव्या बाजूला मोरबे धरणाचं पाणी आणि वाटेचा भाग सोडला तर दोन्ही बाजुनी हिरव्या आणि पोपटी रंगानी लगडलेली जमीन. हे बघून एकदम सुधगडाची आठवण झाली आणि चालण्याचा हुरूप अजून वाढला. पुढे जातो न जातो तोच समोरून एक माणूस येताना दिसला. त्याला वारोसेची वाट विचारली. त्याने "अक्ख्या गावाचे भौगोलिक स्थानंच बदलले आहे" असे सांगत "पुढे गेल्यावर ठाकरवाडी विचारा" असे सुचवले. बरं. बोलण्या बोलण्यात हा गावातला मुख्य माणूस आहे आणि गड त्याच्या देखरेखीखाली आहे असे कळले. 


मागल्या वेळेस प्रबळगडावरच्या काळ बुरुजावरून इर्शालगडाचे थक्क करणारे दर्शन अजूनही आठवत होते. बरेचदा पनवेल रस्त्यावरून खुणावणारा इरशाळगडचा उत्तुंग सुळका. कदाचित याहीवेळी सुळका चढणे शक्य नसले तरी जवळून बघण्याची संधी योगायोगाने आली होती. त्यामुळे पाय रपरप वाडीकडे झेपावत होते. अधून मधून पाऊस-धुके यामुळे वातावरण जरी आल्हाददायक वाटत असले तरी समुद्रसपाटी जवळ असल्यामुळे दमट. जर कुठे पाऊस बंद पडला की गरम व्हायला सुरुवात. पहिल्या दमाच्या ओघात सागरया आणि इंद्रा मागे पडले होते. अतुल आणि मी पुढे,एकमेकांशी काहीच न बोलता धुक्यांमधूनफक्त शांततेचा आनंद घेत होतो. तेवढ्यात दरीत काहीतरी धरपकड झाली. कोणीतरी जनावर किंचाळण्याचा आवाज आला. शांततेचा भंग. "दोन माकडाचं काहीतरी चाललंय" इति अतुल.


बऱ्यापैकी उंचीवर आलो होतो. धरणाच्या विहंगम दृश्याने मन वेडावले. वरून दोघे-तिघे जण उतरताना दिसले. बहुतेक गावठी कट्टा वाहत होते. विचारून खात्री करून घेतली,तेवढीच आपली माहितीत भर! धुक्यामुळे अजूनही सुळका स्पष्ट दिसत नव्हता.

गावकऱ्यांकडून वाटनिश्चिती करून चालायला लागलो. थोड्याच वेळात पठारावर भातचीखलाने आमचे स्वागत केले. दूरवर कुठेतरी पिवळ्या-विटकरी रंगाचं बांधकाम दिसलं,बहुदा शाळा असावी. वाडीत पोहोचल्याची खात्री पटली. भातचीखलाच्या वाफ्यामधले स्वच्छ नितळ पाणी तोंडावर शिंपडून पुढे निघालो आणि वाडीत प्रवेश केला . वस्तीतल्या मावशिबायला रस्ता विचारत सुळक्याकडे निघालो थोडं पुढे चालत गेलो की सुळक्याच्या पायथ्याशी एक छोटं देउळ लागतं. छोट्या धबधब्याजवळ डोंगर कातळातल्या नितळ पाण्याने बाटल्या भरून घेतल्या. तेवढ्यात पावसाची रिप रिप सुरु झाली. सुळक्याच्या अगदी जवळ एका भल्यामोठ्या दगडावर आम्ही आमचा पार्श्वभाग टेकवला. आमच्याआधीच इंद्रा तिथे पोहोचला होता. कुठलातरी शोर्टकट त्याने मारला,असं काहीतरी सांगत होता. आणि वरून ओरडत होता,"अरे लवकर या,पटकन या ". बहुतेक त्याला धुक्यामध्ये हर्षवायू झाला असावा नाहीतर नेहमीप्रमाणे काहीतरी "एक नंबर " दिसलं असावं. आम्ही पोहोचलो तर दृश्य खरोखरीच एक नंबर होतं. प्रबळ माथ्याकडे जाणारी डोंगररांग,मोरबे धरणाचं अधिक उंचावरून दिसणारं पाणी,पनवेल शहर. अर्थात त्यासाठी धुकं विरळ होण्याची वाट पहावी लागत होतीच.

भलामोठा दगड चढून आम्ही एकदम सुळक्याच्या पुढ्यात येउन ठाकलो.याच्यापुढे जाणे आता शक्य नव्हते. एकतर आम्ही बहुतेक मागच्या बाजूने सुळक्याजवळ पोहोचलो होतो. येथून वाट बिकट होती. त्याला वाट म्हणणे सुद्धा अयोग्य. दोन्ही बाजूनी खोल खोल दरी. धुकं असल्यामुळे दरीची भीषणता जाणवत नव्हती. आणि तेवढ्यात धुक्याने रहस्य उलगडावं तसं विरळ होउन आमच्या नजरांना वाट करून दिली, डोळ्यासमोर उभा केला साक्षात इरशाळगडाचा उत्तुंग सुळका,सरळसोट एकदम आकाशाला भिडणारा. डोळ्याचे पारणे फिटले,वाह ,क्या बात !





इरशाळगड:
समुद्रसपाटी पासून जवळपास १५०० फुट उंच . हा गड नव्हे. या गडाला फारसा इतिहास नसावा,कारण उल्लेख कुठेही नाही. गडावर पाहण्यासारखे विशाळादेवीचे मंदिर,टाक्या आणि नेढे. टाक्याच्या अस्तित्वामुळे गडाचा उपयोग कदाचित टेहेळणी बुरुज म्हणून झाला असावा.माथ्यावरून माणिकगड,प्रबळगड,कर्नाळा ,मलंगगड,चंदेरी,माथेरान या कोंकण सख्यांची भेट होते.नेढ्यापर्यंत शिडीने सहज पोहोचता येतं,सुळक्यावर जायचे असेल प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. राहण्यास शाळा योग्य,जेवणाची व्यवस्था आपणच करायची. 

सभोवतालचे निसर्ग रम्य दृश्य न्याहाळून आम्ही माथा उतरायला सुरुवात केली. इरशाळ वाडीकडे उतरताना पावसाची एक जोरदार सर कोसळून गेली. पाऊस हा नेमका उतरताना का कोसळतो हे मला अजून न सुटलेलं कोडं आहे ………… 



1 comment:

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences